Tuesday, December 06, 2016

घेई छंद - पुस्तक परीक्षण


आपल्या आयुष्यात बऱ्याच phases येत असतात. कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ न मिळाल्याने त्या बाजूला पडत जातात. मग अचानक एखाद्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टींची आठवण येते.

मी लहान असताना बरीच पुस्तकं वाचायचो. हळूहळू जसा मोठा होत गेलो तसा पुस्तकांसाठी वेळ कमी मिळायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून पुस्तकांचं वाचन थोडं मंदावलं. तरीही मी जसा वेळ मिळेल तसा काढून पुस्तकांचं वाचन चालूच ठेवलं होतं. बरीच पुस्तकं वाचली तरी वाचलेल्या पुस्तकावर आजवर मी कधी काही लिहिलं नव्हतं. अपवाद फक्त सातवीत असताना लिहिलेल्या काही टिपणांचा. त्यामुळे पुस्तक परीक्षण करण्याचा मला अजून तरी काही अनुभव नाही.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेता 'सुबोध भावे' त्याच्या चित्रपटातील अनुभवांबद्दल एक पुस्तक लिहिणार आहे असं कानावर आलं होतं. मी हे पुस्तक, 'घेई छंद', प्रकाशनापूर्वीच विकत घेतलं. एकंदरीत त्याच्या कट्यार (नाटक) ते कट्यार (चित्रपट) या प्रवासाबद्दल हे पुस्तक आहे.

नुकतंच हे पुस्तक संपवून बाजूला ठेवलं आहे, आणि यावर एखादं परीक्षण लिहिण्याचा विचार करतो आहे. ह्या पुस्तकात एकंदरीत ५ प्रकरणे आहेत. पहिलं प्रकरण त्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल आहे. यात त्याचा 'पुरुषोत्तम' मधला सहभाग, कॉलेज जीवनानंतर जोडलेले मित्र व केलेली सुरुवातीची कामं अशा गोष्टींचा समावेश आहे. कॉलेजनंतर केलेली नोकरी, तीच नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात घेतलेली उडी, 'लेकुरे उदंड जाहली' सारख्या नाटकात अभिनयात अपयश आल्याने झालेली तगमग, संगीताकडे असलेली ओढ, आणि ह्याच संगीत-प्रेमातून जन्मलेला 'मैतर' नावाचा कार्यक्रम सुबोधने आपल्या लेखणीतून फार सुरेखरित्या उतरवला आहे.

दुसरं प्रकरण सुरु होतं तेच मुळी संगीताने भारलेल्या क्षणापासून. राहुल देशपांडे याने केलेली 'संगीत कट्यार काळजात घुसली' ह्या अजरामर नाटकाचं दिग्दर्शन करण्याची विनंती सुबोधला ह्या नाटकापर्यंत आणते. त्यानंतर कास्टिंग, नाटकाचं आकलन, नाट्यपदांचा सराव, राहुल देशपांडे, महेश काळे इ. गायकांना अभिनय शिकवणं वगैरे गोष्टी सुबोधने कशा जमवल्या हे त्याच्याच शब्दांत वाचणे उत्तम. हे प्रकरण वाचताना आपल्याला नाटक बसवणे किंवा नाटकातला अभिनय वगैरे गोष्टी बारकाईने कळतात. एखाद्या नाटकाबद्दल त्या नाटकाचा दिग्दर्शक काय विचार करत असेल, किंवा ते अडीच-तीन तासांचं नाटक बसवायला किती मेहनत घ्यावी लागली असेल हे सुद्धा जाणवतं.

पुढचं प्रकरण 'बालगंधर्व' ह्या चित्रपटावर बेतलेलं आहे. सुबोधला योगायोगानेच 'गंधर्वगाथा' हे पुस्तक मिळतं. बालगंधर्वांच्या जीवनाबद्दल आणि एकुणातच कार्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हे लक्षात आल्यावर त्याला अपराधी वाटू लागतं. या अपराधीपणाच्या भावनेतूनच तो बालगंधर्वांविषयी जे काही साहित्य उपलब्ध आहे ते वाचून काढतो. ह्या भारावलेपणातूनच या विषयावर चित्रपट काढण्याचं नक्की करतो. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गायक वगैरे मंडळी जमवल्यावर स्वतःच्या भूमिकेच्या तयारीला लागतो. बालगंधर्वांच्या भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी आणि घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करुन सोडतात. तब्बल २० किलो घटवलेलं वजन, 'स्त्री'भूमिकेत परफेक्ट दिसण्यासाठी बदललेली जॉ-लाईन, स्त्रियांची देहबोली जमवण्यासाठी केलेले कष्ट, चार-पाच तासांचा मेकअप, शास्त्रीय गायकाचे हावभाव इ. गोष्टी त्याने फार चांगल्या प्रकारे व डिटेलमध्ये लिहिल्या आहेत. शेवटी बालगंधर्वांच्या भूमिकेतून बाहेर पडताना, 'हा चित्रपट माझ्या करिअरचा महत्वाचा टप्पा असेल, पण हे माझं आयुष्य नाही' असं ठणकावून सांगणारा सुबोधही आपल्या मनाला भावतो.

चौथ्या प्रकरणात 'लोकमान्य... एक युगपुरुष' ह्या चित्रपटाबद्दल लिहिलं आहे. 'बालगंधर्व'सारखा चित्रपट केल्यावर लोकमान्य टिळकांवरसुद्धा एक चित्रपट काढावा असं सुबोधच्या मनात येतं. त्याच वेळी त्याला 'ओम राऊत' सारखा टिळकांवर मनस्वी प्रेम करणारा दिग्दर्शक भेटतो. चित्रपटाच्या निमित्ताने लोकमान्यांच्या आयुष्यातले महत्वाचे पैलू सुबोधला भारावून टाकतात. ह्या प्रकरणात सुबोधने काही महत्वाच्या सीन्स बद्दल खूप छान पद्धतीने लिहिलं आहे.

पाचवं प्रकरण 'कट्यार' सिनेमावर आधारित आहे. 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक केल्यापासूनच ह्या विषयावर सिनेमा करावा असा विचार सुबोधच्या मनात घोळत होता हे त्याच्या आधीच्या लेखनावरून वारंवार दिसतं. ह्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी करावी लागलेली धडपड त्याने फार सुरेख पद्धतीने मांडली आहे. पंडितजी आणि खॉंसाहेब या २ भूमिकांचे नायक त्याने बरीच शोधाशोध करून मिळवले. संगीत हा 'कट्यार'चा आत्मा आहे. 'कट्यार' नाटकातली गाणी, नवीन गाणी, त्यांचं संगीत आणि त्याचं गायन हा एक मोठा प्रवास त्याने यात उलगडून दाखवला आहे. प्रत्यक्ष शूटिंग दरम्यानचे अनुभव सुबोधने काहीसे डायरी-फॉर्म मध्ये लिहिले आहेत. त्यामुळे आपण एक real time experience घेत आहोत असा भास आपल्याला होतो.

या पुस्तकाच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. पहिली बाब म्हणजे सुबोधने पुस्तकात कुठेही स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन केलेलं नाही. अगदी प्रस्तावनेतसुद्धा त्याने, 'पुस्तक आवडलं तर श्रेय माझ्या मित्रांचं आणि नाही आवडलं तर त्याचं श्रेय फक्त माझं' अशी नम्र जबाबदारी घेतलेली आहे. पुस्तकात मुख्यतः वर्णित कलाकृती ह्या मराठी चित्रसृष्टीत एक मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृती आहेत. पण तरीही त्याने हे माझ्या अभिनयामुळे साकार झालं अशी दवंडी कुठेही पिटलेली नाही.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याने सर्व सहकलाकारांचं योग्य त्या ठिकाणी व योग्य गोष्टीसाठी भरभरून कौतुक केलं आहे. सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, ओम राऊत, रवी जाधव ('बालगंधर्व'चे दिग्दर्शक), विक्रम गायकवाड (रंगभूषाकार), कौशल इनामदार ('बालगंधर्व'चे संगीतकार), आनंद भाटे ('बालगंधर्व'साठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते गायक), शौनक अभिषेकी (पं. जितेंद्र अभिषेकी यांचा मुलगा, सुबोधचा मित्र), सुधीर पलसाने ('कट्यार'चा सिनेमॅटोग्राफर), शैलेश परुळेकर (फिटनेस ट्रेनर) इत्यादी सहकाऱ्यांचं त्याने ठिकठिकाणी तोंडभरून कौतुक केलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात असलेल्या असंख्य छायाचित्रांनी हे पुस्तक रंगीत बनलेलं आहे.

ह्या पुस्तकाच्या काही त्रुटीही आहेत. अनेकदा खूपच informal लिहिण्याच्या नादात व्याकरणाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. वाक्यांची बांधणी, शब्दांची रचना, र्‍हस्व-दीर्घच्या चुका ह्यामुळे काहीसा अस्ताव्यस्तपणा आल्याचं वारंवार जाणवत राहतं. बऱ्याचदा सहकलाकारांच्या नावाचा गोंधळ वाचकाला होतो. उदाहरणार्थ, 'बालगंधर्व'च्या प्रकरणात, 'महेश' म्हणजे महेश काळे कि महेश लिमये असा गोंधळ उडतो. तसंच काहीसं 'अभिराम' ह्या नावाबद्दल होतं. अभिराम म्हणजे लेखक अभिराम भडकमकर हे समजायला काही पानं मागे उलटायला लागतात. 'कट्यार'च्या प्रकरणात देखील, 'सचिन' म्हणजे सचिन खेडेकर कि सचिन पिळगांवकर असा भ्रम क्वचित होऊ शकतो. अजून एक त्रुटी म्हणजे 'लोकमान्य'च्या प्रकरणामध्ये लिहिलेले काही 'कट्यार'चे अनुभव. हे अनुभव कालानुरूप (chronological orderने) न लावता, विभागवार लिहिले असते तर जास्त चांगले वाटले असते असं राहून राहून वाटून जातं.





या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनही हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावं असंच आहे असं नक्कीच म्हणावसं वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या सुबोध भावेच्या शब्दांत त्याचे अनुभव वाचणे हा खरंच अविस्मरणीय अनुभव आहे.


अन्यत्र प्रसिद्धी :
२. मासिक अंतराळ (जानेवारी २०१७)

Wednesday, November 16, 2016

३३ कोटी + १



ट्रिंग ट्रिंग!
"हॅलो?"
"विज्या, सचिन ९२ वर खेळतोय. मी सुम्याला सांगितलंय, तू वैभ्या आणि मोहन ला सांग."
खाड्! दाम्याने फोन आपटला. काही क्षणात ४ही घरांत टीव्ही लागला होता.

-

"सचिन ९२ वर खेळतोय रे...!!"
पणशीकर चाळीत आरोळी घुमली.
चाळीतल्या एकमेव टीव्हीच्या मालकांना दार उघडण्याचीही तसदी घ्यावी लागली नाही. १७ माकडं काही कळायच्या आत खिडकीतून उड्या मारून टीव्हीसमोरच्या चटईवर मांडी घालून बसली होती. टीव्हीवाल्या तावरे काकांनी प्रत्येकाला एकेक चिक्की दिली, आणि स्वतः कोपऱ्यातल्या खुर्चीत जाऊन बसले.
खोलीतल्या १८ जीवांना आता एकाच गोष्टीची आस लागली होती.

-

शोरूम समोरची गर्दी वाढतच चालली होती.
तेवढ्यात एक माणूस तिकडे आला. त्याने आवाज दिला, "स्कोअर काय झाला रे?"
"सचिन ९२ वर पोहोचला" गर्दीतून ४-५ आवाज आले.
त्या माणसाचे पाय थबकले. भारताचा स्कोअर विचारण्याचं भान ना त्या माणसाला होतं, ना ते उत्तर देणाऱ्या गर्दीला.
सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलं होतं.

-

"अहो ट्रेन का थांबलीये?"
"स्टेशन आलं काकू..."
"अहो पण इतका वेळ? छोटंच स्टेशन आहे ना?"
"हो, पण सचिन ९२ वर खेळतोय ना..."
"अग्गोबाई! हो का? तरीच आमचे 'हे' गेले उतरून पटकन!"
"चला काकू तुम्हीपण मॅच बघायला!"

-

"फोर फोर फोर फोर फोर.... स्स्सस्स्स. गेली असती."
"दाम्या, उगाच आरडा-ओरडा करू नकोस. २ रन काढलेत ना त्याने?" दादा गुरकावला.
"४ काढले असते! आणि तू रे दादा, तुला सांगितलं ना सोफ्यावर डावा पाय वर घेऊन बसू नको म्हणून. सचिन लवकर आऊट होतो अशाने. खाली घे आधी तो."
"गप रे! असं काही नसतं."
"दादा, मारीन हं! ९४ वर खेळतोय म्हणून सांगतोय. नाहीतर असं कधी सांगतो का मी तुला?"
"तू ढीग सांगशील.. मी ऐकणारे का तुझं? आत्ता शेवटचं हां. ते पण ९४ वर आहे म्हणून."

-

"येsss दोन रन. दोन रन. दोन रन."
पोरांना फार वेळ चटईवर बसवेना. उत्साहाच्या भरात सगळी पोरं उठून उभी राहीली. तावरेकाकांनी गडबडीने सगळ्यांना खाली बसवलं. सगळी परत मॅच बघू लागली.
तेवढ्यात सचिन ने १ रन काढली.
"९५..." पोरं ओरडली.
आता उरल्यासुरल्या चाळीलाही सचिनची सेंच्युरी व्हायला आलीये हे कळलं होतं. तावरेकाकांच्या खिडकीबाहेर सगळे जमले. नुकतेच कामावरून परतलेले घरातले कर्ते पुरुष हात-पाय न धुता तसेच धावले. बायकांनीही 'बघू तरी काय चाललंय' अशा विचाराने गर्दी करायला सुरुवात केली.

-

रस्त्यावरच्या लोकांनी थांबून मॅच बघायला सुरुवात केली होती. टी.व्ही. शोरुमसमोरचा रस्ता माणसांनी व वाहनांनी गच्च भरला होता. एकेका रन साठी जोरदार जल्लोष होत होता.
घरी टी.व्ही. नसलेले, ऑफिसमधून घरी जाणारे, घरी सोय असूनही वातावरण अनुभवायला बाहेर आलेले असे असंख्य लोकं तिकडे जमले होते. एरवी एकमेकांना कधी पाहीलंही नसतं असे लोक शेजारी उभे राहून टाचा उंचावत मॅच बघत होते.
"फोर!!" एकच जल्लोष झाला. सचिन ९९ वर पोहोचला होता. कोणत्याही परिस्थितीत त्या रस्त्यावरून कोणीही हलायला तयार नव्हता.

-

रेल्वे स्टेशनची परिस्थिती याहून काहीच वेगळी नव्हती. स्टेशनवरच्या एकमेव टि.व्ही.समोर दोन-अडिचशे माणसांनी गर्दी केली होती. त्यांच्यातल्या किती लोकांना स्कोअर दिसत होता देवच जाणे, पण कित्त्येकांना स्कोअर बघायचीही गरज नव्हती. 'मघाशी ९२ वर होता, मग दोन रन काढले, म्हणजे ९४, त्यानंतर एक सिंगल आणि एक फोर. म्हणजे ९९.' हा हिशेब कधीचा त्यांच्या डोक्यात चालू होता.
त्या इवल्याशा स्टेशनला स्टेडियमचं स्वरूप आलं होतं.

-

आणि स्टेडियम?
विचारायलाच नको! प्रत्येकाच्या हृदयाची धडधड शिगेला पोहोचली होती. प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून एकाच व्यक्तीकडे लक्ष लावून बसला होता. प्रत्येक जण स्वत:ला त्यात बघत होता. आपल्या अपमानाचा, आपल्या दु:खाचा, आपल्या पराभवाचा बदला घ्यायलाच जणू देवाने त्याला पाठवले होते.

आता फक्त १ रन!
सचिन स्ट्राईकवर आला.
"हाऊज् दॅट!!!!" LBWचे जोरदार अपील झाले. करोडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्टेडियममध्ये एकाएकी मरणशांतता पसरली.
अंपायरनेही अंत पाहीला. शेवटी नॉट-आऊट दिले गेले. आख्ख्या स्टेडियमने रोखून धरलेला श्वास सोडला.


पुढचा बॉल! बॉलर बॉल टाकायला धावू लागला. सर्वांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सर्वांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. अवघे स्टेडियम स्तब्ध झाले.

"Four runs!! Beautiful shot to reach the milestone. Sachin Tendulkar completes his century with a spectacular boundary." कॉमेंट्रेटर चित्कारला. आख्ख्या देशात आनंदाला उधाण आले.

दाम्याने सगळ्या मित्रांना फोन करुन आनंद शेअर केला. दादाच्या तर तो गळ्यातच पडला.
पणशीकर चाळीत कुणीतरी साखर आणली. सगळ्या पोरांनी चाळकऱ्यांना साखर वाटली. त्या साखरेत जग जिंकल्याचा गोडवा होता.
शोरूमच्या बाहेर जल्लोषाला उधाण आले. कुणी एकमेकांना मिठ्या मारल्या तर कुणी एकमेकांसोबत नाचू लागले.
रेल्वे स्टेशनवरच्या प्रवाशांनाही इतका वेळ थांबल्याचं सार्थक झालं. जणू काळ थांबवू शकणाऱ्या ह्या जादूगाराचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं.

अवघा देश आनंदात न्हाऊन निघत होता. या 'सचिन' नावाच्या देवदूताच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडत होता.


Sachin Tendulkar image by Adidas. SRT forever



आज सचिन तेंडुलकरला रिटायर होऊन ३ वर्ष पूर्ण झाली. कित्येक अशक्यप्राय विक्रम बनवून त्याने क्रिकेटच्या जगात अढळस्थान प्राप्त केले. मैदानावर राज्य गाजवताना त्याने भारतीय समाजमनाला देखिल एक नवी उभारी दिली. करोडो भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं त्याने २४ वर्ष आनंदाने बाळगलं. आधुनिक भारतीय समाजाच्या जडणघडणीत सचिन तेंडूलकरचा मोलाचा वाटा आहे.
म्हणुनच 'सचिन' नावाचं हे स्वप्न गेली २७ वर्ष आपण हृदयात बाळगून आहोत!






अन्यत्र प्रसिद्धी :


Wednesday, October 26, 2016

दिवाळी Fever

दिवाळीच्या आधीचे ३-४ दिवस मला फार आवडतात. फराळाची वगैरे तयारी चालू असते, लोकांनी आकाशकंदील लावायला सुरुवात केलेली असते, पणत्या शोधून ठेवलेल्या असतात, एकंदरीत कसं, सगळे या आनंद-सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पहात असतात.


याच दरम्यान नवीन काहीतरी खरेदी करण्याची लगबग सुरु झालेली असते. विविध दुकानांचे 'सर्वात मोठे' वगैरे सेल सुरु झालेले असतात. 'दिवाळीचं काय घेतलं?' अशी विचारणा होऊ लागलेली असते. 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमांचा शोध देखील सुरु झालेला असतो. एरवी १०-१० पर्यंत लोळत पडणारे वीरही 'दिवाळी पहाट' साठी लवकर उठायला तयार झालेले असतात. घरोघरी दिवाळी अंकांची आठवण होऊ लागते. मग हा चांगला कि तो, असा किस पाडत २-४ दिवाळी अंक आणले जातात. रोजचा पेपर सुद्धा घाईघाईत उरकणारे आपण, चवीचवीने दिवाळी अंकाची पाने वाचू लागतो.

आधीचे ३-४ दिवस अशी तयारी, स्वप्नरंजन वगैरे करण्यात गेल्यावर actual दिवाळी येते. दिवाळीत तश्या धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजा सोडता, धार्मिक गोष्टी फार कमी असतात. त्यामुळे छान छान कपडे घालून, चकली-चिवड्याचे बकाणे भरत फिरणे याशिवाय फारसं काही काम नसतंच. (ह्यामुळेच कदाचित दिवाळी इतकी लोकप्रिय असावी!) मग जाताजाता उगाच पणतीची वात सरळ करणे, आकाशकंदिलाचं orientation बदलणे, दिवाळी अंकातला दोनदा वाचून झालेला लेख तिसऱ्यांदा चाळणे इत्यादी कामे सुचू लागतात.

धनत्रयोदशीला असलेलं 'आत्ता कुठे सुरु झाली दिवाळी' हे feeling भाऊबीजेपर्यंत 'काय हे! संपली पण दिवाळी' मध्ये परावर्तित झालेलं असतं. परराज्यातले लोक घरी गेल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर अनुभवास आलेली 'दुर्मिळ मराठी शांतता' हळूहळू संपू लागलेली असते. फराळाचे डबे रिकामे होऊ लागलेले असतात. काही दिवसात आकाशकंदील परत खाली उतरवला जातो, पणत्या कपाटात जातात, आणि माणसं आपापल्या कामात मग्न होतात. मग मधेच कुणाला तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी फटाक्यांमुळे आलेली गोड जाग, किंवा भाऊबीजेचं ओवाळताना बहिणीने मारलेले टोमणे अशा गोष्टी आठवतात, आणि आपण पुढच्या दिवाळीची परत एकदा आतुरतेने वाट बघायला सुरुवात करतो.

असो! अजून दिवाळी सुरु व्हायचीये. त्यामुळे सध्या 'धनत्रयोदशी मूड' मध्ये जायला हरकत नाही. घरादाराची साफसफाई, पणत्यांची शोधाशोध सुरु करायलाही हरकत नाही. दिवाळीची खरेदी मित्रांना दाखवायला आणि त्यांचा आनंद वाटून घ्यायलाही हरकत नाही.

सर्वांना ह्या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा!

Image source : Google

Saturday, June 25, 2016

ब्रेक्झिट-पुराण


ब्रेक्झिट झालं! कोण तो ब्रिटन देश कुठल्याश्या यूरोपियन युनियन मधून बाहेर पडला. आमचा काय संबंध? काsssही नाही! पण आम्हाला चघळायला विषय तर मिळाला ना...

"कित्ती बावळट आहेत हे ब्रिटनचे लोकं", "स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.", "राहिले असते सुखाने तर काय बिघडलं असतं?" इथपासून ते "ब्रेक्झिट म्हणजे काय असतं रे?" किंवा "आपला काय संबंध त्याच्याशी?" पर्यंत प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. हल्ली ह्या असल्या प्रतिक्रिया देणं किंवा एखाद्या विषयावर घनघोर चर्चा करणं किंवा आपलं असलं-नसलं सगळं ज्ञान पाझळणं हे फार सोप्पं होऊन गेलं आहे. एखाद्या विषयावर सर्च करायचं, एखादी बऱ्यापैकी दिसणारी (म्हणजे interface वगैरे बरंका) website पकडायची आणि द्यायची लिंक पाठवून गावभर! ह्यातून होतं काय? तर आपल्याबद्दल असा सुगैरसमज (हा माझाच शब्द बरंका! चांगला पण चुकीचा समज याअर्थी. कसा वाटतोय?) पसरतो की ह्याला कळतंय बुवा खूप काही! खरंतर आपण किंवा सुगैरसमज करून घेणाऱ्यानी ती website वरची गोष्ट पूर्ण वाचलेलीच नसते (किंवा वाचली तरी कळते किती जणांना काय माहीत!). पण असं कसं सांगायचं? आपल्याबद्दल कुगैरसमज पसरणार नाहीत का? असं कसं होऊन चालेल? नाही नाही! त्यापेक्षा काहीतरी मोघम बोलायचं. चर्चा वाढवत ठेवायची.

तर मुद्दा होता 'ब्रेक्झिट'चा! तिकडे ते ब्रिटनवाले बाहेर पडले, त्यांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि इकडे आमची चर्चा सुरू झाली. ह्या असल्या चर्चा त्या NEWS चॅनेलवाल्यांपेक्षा जास्त रंगतात, वाढतात, फोफावतात आणि भरकटतात असा अनुभव आहे. त्या चॅनलवाल्यांकडे 'ब्रेक के बाद'चं अस्त्र तरी असतं. एक तासाची वेळ तरी असते. इथे कसलं काय? सगळेच तापलेले! तावातावाने बोलायचं, कशाची तरी बाजू घ्यायची आणि मुद्दे मांडायचे! तर अशी ही चर्चा सुरू झाली. कुणीतरी म्हणलं की मूर्खपणा केला या ब्रिटनवाल्यांनी, कुणीतरी म्हणलं बरोबरच आहे त्यांचं. कुणी पहिल्याची री ओढतंय, कुणी दुसऱ्याला पाठिंबा देतंय. कुणी लिंक्स पाठवतंय तर कुणी व्हिडिओ. हे असलं सगळं तप्त वातावरण चालू असतानाच एक कोणीतरी आला आणि म्हणू लागला की काय त्या 'ब्रेक्झिट' वर चर्चा करता, भारतातल्या खेडोपाडी काय कमी प्रश्न आहेत का? झालं! सगळे त्याच्यावर तुटून पडले. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं म्हणजे भारतातल्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील असणं असं नाही, वगैरे त्याला सांगू लागले. इतका वेळ ब्रिटन चा कौल बरोबर की चूक यावर तावातावाने भांडणारे आता एक होऊन 'ब्रेक्झिट'वर चर्चा करावी का नाही यावर भांडू लागले. यातच कुणीतरी चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे वगैरे ज्ञानामृत पाजायला सुरू केलं आणि भांडाभांडीचा नुसता कल्लोळ उडाला.

कालांतराने मूळ मुद्दा बाजूलाच राहून, 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कितपत योग्य आहे यावरच जास्त चर्चा होऊ लागली. 'ब्रेक्झिट'वर चर्चा करणं हे कसं जास्त 'ग्लॅमरस' वगैरे आहे, आणि भारतातल्या प्रश्नांवर चर्चा करणं हे कसं लोकांना 'अनइंटरेस्टिंग' वाटतं असले मुद्दे येऊ लागले. अश्या वेळेला माझी अवस्था मोठी विचित्र होते. कधी ह्याचं तर कधी त्याचं असं मला दोन्ही बाजूचं पटू लागतं. मग मत मांडणं सोडाच, पण मत बनवणं पण कठीण होऊन बसतं. तर ही चर्चा सगळे दमल्यावर थांबली. कुण्या शहाण्यांनी कुंपणावर बसून सल्ले देत सारवासारव केली आणि सगळं एकदम कसं छान-छान वाटू लागलं.

चर्चा थांबली, तरी मनातलं द्वंद्व थांबेना. 'ब्रेक्झिट'मागचं Economics आणि Politics समजून घ्यायची इच्छा माझीही होती, पण त्यापेक्षा आपण भारतातले प्रश्न समजून घेण्यासाठी इतका आटापिटा कधी केला होता का, असा प्रश्न मनात येऊ लागला. या चर्चेत काही लोकांनी अप्रत्यक्षपणे 'भारताचेच प्रश्न का महत्वाचे? आपण सगळ्याचा विचार केला पाहिजे' असा काहीसा उदारमतवादी सूर लावला होता. ते मात्र मला नक्कीच पटलं नव्हतं. अर्थात 'ब्रेक्झिट ला काय मोठं सोनं लागलंय, त्यापेक्षा भारतात बघा किती विषमता आहे' ह्या विधानाला सुद्धा मी नाक मुरडलं होतं. कुठलातरी मध्यममार्ग मला खुणावत होता, पण सापडत मात्र आजिबात नव्हता. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी माझा विचार करायला सुरुवात केली. भारतातले प्रश्न महत्वाचे नक्कीच आहेत पण म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करूच नये असं काही नाही, असं साधारण मत बनलं. पण यावर दोन प्रश्न माझ्या मनात आले की, 'भारत इतका महत्वाचा का?' आणि 'आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास का करायचा?' यापैकी दुसरा प्रश्न सोपा होता. त्याच्या उत्तराची मला सवय होती. मला खुणावत होता तो पहिला प्रश्न! 'भारत इतका महत्वाचा का?'

मध्यंतरी कुठल्याशा websiteवर एक प्रश्न वाचला होता. 'जर आपण कोठे जन्म घेतो हे आपल्या हातात नसेल, तर आपण आपल्या देशाचा अभिमान का बाळगावा?' तेंव्हासुद्धा मनात विचार सूरु झाला होता. भौगोलिक प्रदेशावर असणाऱ्या प्रेमाला (किंवा आदराला) हा सवाल होता. 'भारत माझा देश आहे' या वाक्याच्या अर्थाचा मनोमन विचार करायला लावणारा हा प्रश्न होता. देश माझा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे असं वाटत नाही का? हे असले प्रश्न त्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने मनात पिंगा घालू लागले.

भारतीय असल्याचा नक्की अभिमान तरी का? तर हा अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा, आमच्या इतिहासाचा आणि आमच्या परंपरांचा. अभिमान वाटतो तो इथल्या विचारधारेचा, इथल्या माणसांचा आणि या माणसांमध्ये असलेल्या माणुसकीचा. भले यात माझं काहीही कर्तृत्व नसेल, पण तरीही मला याचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. आपण इथे शहरांत बसून हे असले विचार करत असतो. कुठल्यातरी abstract गोष्टींवर विचार/चर्चा करत बसतो. देशाचा अभिमान बाळगावा की नाही याचा किस पाडत बसतो, पण त्या देशासाठी, किंवा कुणासाठीच करत मात्र काहीच नाही. हे सगळं असं असेल तर उपयोग काय अभिमान वाटून किंवा न वाटून? एखाद्या दुष्काळपीडित किंवा अंधश्रद्धाग्रस्त गावात काम करणारा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, किंवा सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी लढणारा जवान असेल, त्यांच्या मनात असले विचार का येत नाहीत? 'ब्रेक्झिट'वर चर्चा करता करता भारतातल्या प्रश्नांकडे पण लक्ष द्यावं असं त्यांना का वाटत नसेल? कारण ते ह्या देशाविषयी त्यांच्या मनात असलेला अभिमान जगत असतात. देशातल्या लोकांविषयी मनात असलेली आस्था कामात उतरवत असतात. त्यांना ह्या असल्या conflicts साठी वेळच नसतो मुळी! त्यांना 'देशाचा अभिमान का बाळगावा?' या प्रश्नापेक्षा 'देशासाठी काय काम करावं?' हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटत असतो.

हे सगळं माझ्या मनात आलं, आणि त्या 'ब्रेक्झिट'चर्चेमधला 'कृतीवर भर द्या' सांगणारा 'तो' आठवला. त्याच्या विचारांमधला खोल भाव हळू हळू लक्षात यायला लागला. अजूनही मला एकाच वेळी दोन्ही बाजू पटत असतात, पण दोन्ही बाजूंपेक्षा त्यातला सुवर्णमध्य मला जास्त जवळचा वाटतो. जेंव्हा चर्चा, मग ती कोणत्याही चकाकत्या किंवा साध्याशाच विषयावरची असो, संपून कृतीची सुरुवात होईल, तेंव्हाच तो सुवर्णमध्य खऱ्या अर्थाने साधला जाईल.

Tuesday, June 07, 2016

बसल्या बसल्या


कधी कधी वाटतं की नुसतं बसावं...

डोळे उघडूही नयेत अन् मिटूही नयेत.
श्वास सोडूही नये अन् घेऊही नये.
फक्त बसावं.

काहीच करु नये. कुठेच जाऊ नये.

खिडकीतून वारा येईल,
झाडांची पानं हलतील,
ते फक्त बघावं.
पचवावं.
परत बघावं.
परत पचवावं.
हा वारा कधी थांबूच नये असा विचार करावा.
थांबल्यावर,
परत वाहू नये असा धावा करावा.
तो वारा, ती पानं, ते आपण, असंच असावं.
विचार करत करत फक्त बसावं.

कुठलासा गंध येईल,
कसलासा आवाज येईल.
कुणीतरी कुठेतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी कुणालातरी काहीतरी सांगेल.
आवाजांमागून आवाज, ऐकत रहावं.
ऐकत ऐकत फक्त बसावं.

एखादी कविता आठवेल,
एखादं यमक जुळेल,
एखादी चाल सुचेल.
ती चाल मनात घोळवत ठेवावी.
मनातल्या मनात गुणगुणत रहावी.
कवितांचे छंद, चालीचं सौंदर्य आठवत रहावं.
आठवत आठवत फक्त बसावं.

मनाच्या कोलाहलाला प्रतिसाद देत,
हृदयाच्या स्पंदनांना आश्वासनं देत,
भावनांच्या आवेगाला विश्राम देत, फक्त बसावं.

निवांत. पोकळ. रितं. शून्य.

Image source - TinyBuddha

EDIT : हा लेख (कविता वगैरे म्हणावं कि नाही अशा संभ्रमात आहे मी अजून!) वाचून झाल्यावर माझ्या 'कपिल जगताप' नावाच्या मित्राने त्याने काढलेला एक उत्कृष्ट फोटो मला पाठवला. विषयाला अगदी अनुरूप फोटो सापडल्याने लागलीच हा फोटोसुद्धा upload करावा असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तो केलासुद्धा!




Tuesday, May 10, 2016

ग्रेस...!!



कवी ग्रेस यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या चपखल शब्दांच्या आणि गूढ अर्थाच्या कवितांचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. 'ग्रेस' या नावाने अजरामर कविता लिहिणाऱ्या या कवीचं खरं नाव 'माणिक गोडघाटे'. आजच्या दिवशी त्यांच्या एखाद-दोन कविता इथे लिहाव्या असं वाटलं म्हणून हि Blog-Post.


'या व्याकुळ संध्यासमयीं' आणि 'पाऊस कधीचा पडतो' ह्या माझ्या खूप आवडत्या कविता आहेत. ग्रेसांच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अर्थ. प्रत्येक वाचनात नवा अर्थ उलगडणाऱ्या या कविता मला म्हणूनच आवडतात.


या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें
मी अपुले हात उजळतो.

तू आठवणींतुन माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं...

पदराला बांधुन स्वप्‍नें
तू एकट संध्यासमयीं,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई...

तू मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या काठीं
वळिवाचा पाऊस यावा !


वरवर पाहता संध्याकाळचं वर्णन आहे असं वाटणारी हि कविता खरंतर आयुष्याचा अर्थच सांगून जाते. कितीही वाचली तरी आपलं मन अतृप्त ठेवणारी अजून एक कविता म्हणजे 'पाऊस कधीचा पडतो'. 


पाऊस कधीचा पडतो 
झाडांची हलती पाने 
हलकेच जाग मज आली 
दु:खाच्या मंद सुराने 

डोळ्यात उतरले पाणी 
पाण्यावर डोळे फिरती 
रक्ताचा उडला पारा 
या नितळ उतरणीवरती 

पेटून कशी उजळेन 
हि शुभ्र फुलांची ज्वाला 
तार्‍यांच्या प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला 

सन्दिग्ध घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनार्‍यावरती 
लाटांचा आज पहारा



आपल्या कवितांबद्दल बोलताना ग्रेस एकदा म्हणाले होते कि, 'माझ्या कविता एखाद्या स्वगतासारख्या आहेत. मुळात स्वगतात अस्तित्वाच्या जाणीवेचा अभाव असतो. त्याला श्रोत्यांच्या अस्तित्वाची गरज नसते, किंवा ते आहेत याचं भानही नसतं. मी एक असा कवी आहे जो भाषेत नव्या शब्दांची निर्मिती करायलाही मागेपुढे पाहत नाही.' 



Image Source - Internet



ग्रेसांच्या कविता दुर्बोध आहेत. या कवितांचा अर्थ सामान्य माणसाला लवकर उमजत नाही. पण यामुळेच ग्रेसांच्या कविता स्पेशल ठरतात, वाचकाच्या मनात एक गहिरा तरंग उमटवून जातात.

Sunday, March 27, 2016

सब'मिशन'... 'अरे देवा' पासून 'सुटलो एकदाचा' पर्यंत


"You are required to submit all your theory and practical assignments on Monday, without fail. Attendance defaulters' list has been displayed on the notice board. You must pay the fine before submitting your files."


सगळ्या कॉलेजांमध्ये थोड्याफार फरकाने होणारी ही announcement. सेमिस्टरचा सूर्य क्षितिजाकडे ढळल्यावर सुरु होणारी लगबग ही सबमिशनची असते. हा सूर्य सुखाने मावळू नये याची पुरेपुर दक्षता University ने घेतलेली असतेच, पण त्याआधी मुलांची जास्तीत जास्त वाट कशी लागेल याची काळजी ही कॉलेजं घेत असतात. ही प्रक्रिया परिपूर्ण व्हावी यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. यात विविध प्रकारच्या assignments, files, journals याचा समावेश असतो. हे सगळं कमी की काय म्हणुन defaulters' list चे काही प्रकार या युद्धात उतरवले जातात. आता हा Defaulters' list काय प्रकार आहे असा प्रश्न काही अजाण वाचकांना पडला असेल. साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर Defaulters' list हा मुलांना त्यांनी केलेल्या सगळ्या पापांची आठवण रहावी यासाठी कॉलेजने केलेला एक प्रांजळ खटाटोप आहे. आता यासाठी Attendance, Timely submission of assignments, Guest lecture appearance इत्यादी सोज्वळ शब्द वापरले जातात.

Attendance कमी असल्याचं कारण पुढे करुन Defaulters' list मध्ये नाव add केलं जातं. आता आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवून ठेवलं आहे, 'कॉलेजमध्ये लेक्चर करु नये'. ते काय मूर्ख आहेत का? पण नाही! 'As per university norms, you are required to attend at least 75% lectures and 100% practicals. Institute expects students to attend 90% of the total lectures.' अशा आशयाची प्रेमपत्रे सगळ्यांच्या घरी येऊ लागतात. आता ९०% लेक्चर्स केली तर समाजात एखाद्याची किती बेअब्रू होईल? पण या अब्रूनुकसानीची कॉलेजला पर्वा नसते. ते कमी attendanceवाल्यांची Defaulters' list लावून मोकळे होतात, आणि सबमीशनच्या आधी अजुन एक भूत मुलांच्या डोक्यावर येऊन बसतं.

बरं हे सगळं इथेच थांबतं असं नाही. या Defaulters' list च्या भूतावर उतारा म्हणुन Department च्या चरणी fineची दक्षिणा अर्पण करावी लागते. ही दक्षिणा अर्पण करण्याची प्रक्रिया ही देखिल दोन-पाचशे रुपये देणे व रिसिट मिळवणे इतकी साधी नसते. आधी Defaulters' list मधलं आपलं नाव शोधण्याची कसरत करावी लागते. बर, या list चे फोटो काढून इतरांचा त्रास कमी करावा, तर तेही कॉलेजला पसंत नसतं. प्रत्येकाने येऊन त्या list मधलं नाव शोधून आपला आकडा जाणून घ्यायचा असतो. तो आकडा कळल्यानंतर समोरच्या शिक्षकाकडून, 'तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती' पासून 'तू आपल्याच कॉलेजमध्ये शिकतोस का रे?' पर्यंतचे सर्व टोमणे सहन करायचे असतात. (टोमणे ऐकले म्हणजे fine मधून सूट मिळाली असा अर्थ अज्ञांनी कृपया काढू नये. Fine भरणे हे विद्यार्थ्याचे प्राक्तन असते.) टोमणे ऐकून झाल्यावर fine भरण्याच्या ठिकाणाकडे प्रस्थान करावे लागते.

तिथे सर्वसाधारणपणे आपल्याला सकाळी दात घासायला लागलेला ५ सेकंदांचा जास्तीचा वेळ, गाडीला मारायला लागलेल्या (तब्बल!) ३ किका, कॉलेजच्या पार्किंगमध्ये आपल्या सुंदर मैत्रिणीबरोबर फक्त 'Hi' करण्यासाठी घालवलेला १३ सेकंदांचा वेळ, ही सगळी विलंबस्थळे आठवावीत इतकी मोठी रांग असते. ती रांग बघुन आपल्याला दोन-अडिच तासांनंतरचं घड्याळ दिसू लागतं. एकाच दिवसात fine भरणे व सबमीशन करणे ही दोन कामं असल्याने आपण अस्वस्थ होतो. आपली नजर आता एखादा मित्र शोधत असते. आपल्या पुढे उभा आहे या एकाच qualification वर आपल्याला एखादा पोरगा आपला जीवश्च कंठश्च मित्र वाटु लागतो. भले गेल्या दोन-अडिच वर्षात आपण त्याचं तोंडही बघितलेलं नसेना का, त्याच्या जवळची जागा आपल्या मैत्रीचा दुवा बनते.

"अरे, रुपेश! काय म्हणतोस? इथे कसा काय? Attendance कमी वाटतं तुझा पण..." आपण हसण्याचा आटोकाट प्रयत्न करत बोलतो.
पण अशा वेळी बरोबर येईल तो अंदाज कसला?
"अरे रुपेश नाही रे, दिपक. तुझं बोल, तू काय म्हणतोस?"
बोंबला. म्हणजे नावही चुकलं.
मी असलेलं नसलेलं सगळं अभिनय कौशल्य पणाला लावुन कसा Slip of Tongue झाला हे पटवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं 'दिपक' हे नाव कसं अगदी तोंडावरच होतं ते सांगु बघतो. एरवी त्याने 'दिपक' ऐवजी 'दिपीका' जरी सांगीतलं असतं तरी मी हेच केलं असतं याची मनोमन खात्री पटते. Meanwhile आपल्या येण्याचा नेमका उद्देश त्यालाही कळलेला असतो. तो आपल्याला जागा करुन देतो. रांग पुढे सरकत राहते. २ तासांचा अंदाज सपशेल चुकुन एव्हाना दुपार झालेली असते. Fineचे पैसे घेऊन आपल्या हातात रिसीट कोंबली जाते.

आता आपल्याला सबमिशन करायचं असतं. सबमिशनसाठी आपल्याला दारोदार कसं फिरावं लागेल याची सोय कॉलेजने आधीच करुन ठेवलेली असते. प्रत्येक file साठी वेगळं ठिकाण आणि वेगळी गर्दीसुद्धा. सगळ्यात कमी गर्दी कुठे हे शोधण्याचा आपला प्रयत्न फोल जातो आणि आपण एखाद्या रांगेत दाखल होतो. मित्र शोधून घुसण्याची कला तमाम विद्यार्थी वर्गाला अवगत असल्याने वेळेबरोबर आपल्या पुढची रांग कमी होण्याऐवजी वाढत जाते. अखेर कसंतरी आपण सरांपर्यंत पोहोचतो, आणि सरांना कोणाचा तरी फोन येतो (किंवा लंच टाईम होतो, किंवा शिपाई बोलवतो, किंवा त्यांनाच कंटाळा येतो. यातलं काहीतरी आपल्याच वेळी होणं हे जणु गरजेचंच असतं.) सरांनी आपली फाईल हातात घेईपर्यंतचा वेळ (वेळ हा फारच क्षुल्लक शब्द आहे. 'कालखंड' वगैरे बरोबर वाटतंय. नाही?) जाता जात नाही. अखेर आपल्या मुखकमलावर जाणीवपूर्वक तिरस्करणीय भाव उमटवून, आपल्या फाईलला मोक्ष दिला जातो.

ह्या सगळ्याचा प्रत्येक विषयासाठी repeat telecast घडवला जातो. काही वेळा आतल्या कागदपत्रांचा (म्हणजे index पासून (प्रचंड खपून; अहोरात्र कष्ट वगैरे करुन लिहीलेल्या) assignments पर्यंत सगळं) उद्धार केला जातो.

'इतकं कोण बघतंय?', 'एखादं चालतं राहीलेलं', 'सगळ्या प्रिंटस् सेमच दिसतात, काही नाही कळत कुणाला' हे सगळं (आदल्या दिवशीचं) शहाणपण अंगाशी यावं अशी परिस्थिती निर्माण होते. थोड्या शिव्या खाऊन व काही(शे) कटाक्ष पचवून झाल्यावर आपली सुटका होते.

अखेर दिवसभराच्या अथक प्रयत्नांती सबमिशनचं शिवधनुष्य उचलण्यात आपण यशस्वी होतो. पुढच्या semester ला परत येणार हे माहीत असुनही सबमिशनच्या या राक्षसाला वाकुल्या दाखवत आपण त्याचा निरोप घेतो.

Friday, February 05, 2016

ब्लॉगरबाळ्या, सिग्नल आणि आदर्श'वाद'…

तो मुलगा दिसला तुम्हाला? तो. तिकडे. थोडं उजवीकडून पहा बरं. हां. दिसला? बरोब्बर! तोच तोच. नीट बघा. तोच आपला ब्लॉगरबाळ्या.

ब्लॉगरबाळ्या... caricature by 'बाबा' ;) 

ब्लॉगरबाळ्या! एक साधा, सरळ मुलगा. हुशार, तरीही मिश्किल आणि चलाख, तरीही वेंधळा. आता तुम्ही म्हणाल यात काय बघण्यासारखं आहे? तर थांबा. बघण्यासारखं नसलं तरी ऐकण्यासारखं नक्कीच आहे.

हा पोरगा ब्लॉग लिहीतो. मराठी ब्लॉग. काय लिहीतो बरं हा त्याच्या ब्लॉगवर? हा पहा त्याचा ब्लॉग. आपला हा ब्लॉगरबाळ्या आजुबाजुच्या लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांना जसंच्या तसं आपल्या ब्लॉगवर उतरवतो. कधी त्या लोकांबद्दल, कधी त्यांच्या बोलण्या-वागण्याबद्दल, कधी त्यांच्या चालीरितींबद्दल तर कधी या लोकांमुळे आलेल्या अनुभवांबद्दल. ब्लॉगरबाळ्याचं लेखन सतत चालु असतं.

अगदी परवाचीच गोष्ट. ब्लॉगरबाळ्या रस्त्याने चालला होता. तेवढ्यात दोन माणसं बोलत बोलत त्याच्या जवळ येऊन थांबली. ब्लॉगरबाळ्याला त्यांचं बोलणं स्पष्टपणे ऐकु येऊ लागलं.

"कसा सिग्नल मोडुन गेला बघ तो...!!"
"जाऊदे रे, घाई असेल."
"घाई कसली आलीये? लवकर निघता येत नाही?"
"नसेल जमलं कदाचित..."
"मग जमवायचं. वेळेत पोहोचायचं असेल तर वेळेत निघायला नको?"
"अरे चूका होतात माणसांकडुन. प्रत्येक वेळी आपण त्यांना धारेवर धरणार का?"
"चूका होतात हे मान्य आहे. पण एका चूकीवर पांघरुण घालायला दूसरी चूक करायची? तेही जाणुनबुजुन?"
"मग काय करणार? उशिरा पोहोचणार? उशिरा गेल्याने होणारं नुकसान दिसत असतं डोळ्यासमोर. मग त्यातुन वाचण्याचा हा सोपा मार्ग. बस् इतकंच."
"हे बघ, सिग्नल मोडणं हा सोपा मार्ग नक्कीच नाही. आपल्याबरोबरच दुसऱ्याच्याही जीवाशी खेळ आहे हा."
"पण तितकी काळजी घेतच होता तो..."
"रस्त्यावर गाडी चालवणारे सगळेच काळजी घेत असतात; तरी अपघात होतातच ना?"
"ते त्यांचं नशिब!"
"वा... कृत्ये आपण करायची आणि परिणाम नशिबावर ढकलायचा?"
"हे बघ, अशा काही गोष्टी असतातच ज्यांच्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो."
"आणि ज्या आपल्या हातात असतात त्या? त्यांचं काय? की त्या पण नशिबावर ढकलून मोकळं व्हायचं?"
"असं म्हणायचं नाहीए मला. पण काही वेळा परिस्थितीच अशी असते की आपल्यासमोर इलाज नसतो."
"मग परिस्थितीच्या नावाखाली चुका करायच्या आणि काही झालं की डोक्याला हात लावायचा."
"चूक-बरोबर, योग्य-अयोग्य हे सगळं सापेक्ष असतं. हा सिग्नल मोडणं ही त्या माणसासाठी कदाचित योग्य कृती असेल."
"म्हणजे सगळं ह्यांनीच ठरवायचं. सिग्नलची पद्धत ज्यांनी सुरु केली किंवा जे सिग्नल पाळतात ते मूर्खच ना?"
"ते त्यांच्या दृष्टीने योग्य होतं. हे याच्या दृष्टीने आहे."
"म्हणजे प्रत्येकाने फक्त स्वत:च्या स्वार्थापुरता विचार करायचा? अनागोंदी माजेल अशाने."
"स्वार्थापुरता नाही रे... सोयीचा."
"आणि आपली सोय पाहताना दूसऱ्याची गैरसोय होत नाही ना हे पाहणंही आपलंच कर्तव्य आहे ना?"
"प्रत्येक वेळी असा विचार करणं शक्य आहे का रे? "
"शक्य आहे की नाही माहीत नाही. पण गरजेचं आहे एवढं नक्की."
"आदर्शवादी झालं हे सगळं..."
"आदर्शाकडे वाटचाल म्हणजेच तर जीवन. नाही का?"
"पण आदर्शवादाची अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षाभंगाचीच तयारी ठेवणं नाही का? परफेक्ट कोणीच नसतो. आपण आहोत? नाही ना... मग समोरच्याकडुन कशी काय अपेक्षा?"

वादाला शेवट नसतो. वादाचं संवादात रुपांतर हाच वादाचा निकाल. कुणाला पहिला बरोबर वाटेल तर कुणाला दूसरा. ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबुन राहून शेवट त्यालाच ठरवु देणं हेच काय ते आपल्या हातात.


इति ब्लॉगरबाळ्या

Contact Form

Name

Email *

Message *